||आपलाचं संवाद आपुल्याशी|
नवं वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष २०२२ गेलं.वर्ष २०२३ आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.
उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.
फक्त नव्याचा भास असत़ो. सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. काही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत. एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत.
या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात. ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग अभासाच्या हिंदोळयवरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.
खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे.
गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.हे वर्ष आपण जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं. बाय -बाय २०२२ व वेल कम २०२३ अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल कमी असं घसाफोड सुरुच असते. घराघरावर केलेली रोषणाई. चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात माणसं.
नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं. नवं वर्ष आलं की एकच जल्लोष.
नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना प्रसन्न होत असेल का? असं काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही.कसूर करायची नसते.माणसं एखाद्या संकल्पनेच्या किती प्रेमात पडतात,नाही?
रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घराघरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते आपण पितो.आपल्याला नाचायचं असतं आपण नाचतो.आनंद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने करत असतो. निमित्त हवं असतं.
तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?
आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात. ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.
आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?काळाच्या लाटेत सारं अथांग सागराची मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं. दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?
आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू. आपलं आयुष्य आपणचं सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
परशुराम सोंडगे
||Youtube||Blogger||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा